शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबईसह कोकण आणि नाशिक येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ देण्यात आली होती. मात्र यावर आक्षेप घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते.
ठाकरे यांच्या शिवसेनेची ही मागणी मान्य करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचा कालावधी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित केला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होता.
निवडणुकीत मतदानासाठी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे मतदारांना त्यांचा लोकशाही हक्क बजावणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे निवडणुकीत मतदान कमी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, मतदानाची वेळ वाढवणे गरजेचे होते.आयोगाने आमची मागणी पूर्ण केली असून याचा फायदा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी होईल,’ असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.
त्यामुळें राज्यात येत्या २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मतदारांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.