तलाठी भरती परीक्षेत प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ११४ चुका – उमेदवारांसाठी भूमी अभिलेख खात्याचा निर्णय…
तलाठी भरती परीक्षेच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिका, उमेदवार उशिरा आल्याने परीक्षा केंद्रात नाकारलेला प्रवेश, परीक्षेत करण्यात आलेली हायटेक कॉपी आणि त्यानंतर पकडलेले आरोपी, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याची झालेली मागणी, आंदोलनांमुळे अनेक उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यात आलेल्या अडचणी अशा विविध कारणांनी बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेत पहिल्यापासूनच विविध अडचणी, अडथळे येत आहेत.
हे सर्व अडथळे पार केल्यानंतर आता परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरे यात घोळ झाल्याचे समोर आले आहे.
ही बाब परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने देखील मान्य केली आहे. या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख खात्याने ‘त्या’ प्रश्नांबाबत १०० टक्के गुण उमेदवारांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


