नंदुरबारमध्ये दोन गटांत वाद झाल्याने दगडफेक व जाळपोळ
नंदुरबारमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत अचानक दोन गटांत वाद झाल्याने तुफान दगडफेकीत झाली. दगडफेक करणाऱ्यांनी पोलिस आणि त्यांच्या वाहनांना लक्ष बनवल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. यावेळी जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. ही घटना आज (दि. १९) दुपारी तीनच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईद- ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त हजारो जणांचा जमाव नंदुरबार शहरातील रस्त्यावर उतरलेला होता. त्याचवेळी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे घडलेली दगडफेक आणि निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांनी नंदुरबार शहरात बंदोबस्त तैनात केलेला होता. तरीही वाद घडला आणि अचानक जोरदार दगडफेक सुरू झाली.नेमका वाद कशावरून झाला हे स्पष्ट नाही. दगडफेक करणाऱ्या जमावाने पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत.
शहरातील प्रमुख बाजारपेठ देखील लक्ष बनवण्यात आल्यामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण शहर बंद पडले. दक्षता म्हणून शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. माळीवाडा, सोनार, खुंट, तेली गल्ली, काळी मशीद परिसर अशा प्रमुख ठिकाणी काही दुकानांचे व काही घरांचे नुकसान झाले. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर पोलिसांना करावा लागल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप तणाव कायम असून पोलीस दल नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. पाचनंतर परिस्थिती नियंत्रित आली.
तीन घरे आणि तीन दुचाकींना आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
या घटनेनंतर अफवा पसल्या आणि नागरिकांचीही धावपळ उडाली. यामुळे दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाली, शाळा देखील सोडण्यात आल्या. परिणामी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.