जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रथमच विधान भवनाला भेट
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील एकूण १४ आश्रमशाळेचे विद्यार्थी, शिक्षक हेमंत भास्कर मोरे व शिक्षिका शितल भिकन लिंडाईत हे सहभागी होते. तांडा, वाडी-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे, त्यातलाच भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज पाहिले.
या अभ्यास भेट दरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गलरी, गेट वे ऑफ इंडिया इ.ठिकाणांना देखील भेट दिली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘ शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे ‘ आहे सांगत, शिक्षण आणि प्रगल्भता समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन आपल्या कुटुंबाची आणि राष्ट्राची प्रगती साधावी, हेच शासनाचे उद्दिष्ट आहे असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
या संपूर्ण अभ्यास भेटीच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा आणि शिक्षणाची नवी दिशा मिळेल याचा विश्वास आहे. शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे शिक्षणाचे दार सर्वांसाठी खुले करण्याचा प्रयत्न सुरूच राहील असे देखील प्रतिपादन यावेळी मंत्री अतुल सावे यांनी केले.
या अभ्यास भेट दौऱ्यात राजदेहरे,पिंपरखेड,करगाव,वलठाण,लोणजे,वरखेड,दडपिंप्री,तळबन,गाळण,राणाईचे,गडखांब,केकतनिंभोरा,मांडवेदिगर,चारठाणा या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या अभ्यास भेटीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल, संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, नाशिक विभाग उपसंचालक भगवान वीर, जळगांव सहाय्यक संचालक योगेश पाटील व विशेष कार्यकरी अधिकारी नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन लाभले.


