आश्रमशाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, मुख्याध्यापक, अधिक्षक निलंबित
मेळघाटमधील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत भीषण दुर्घटना घडली असून, भिंत कोसळून सुमरती सोमा जामुनकर या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अचलपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा आहे. या शाळेतील वसतिगृहात पाण्याच्या टाकीची भींत अचानक कोसळली. त्यावेळी काही विद्यार्थिनी तिथे उपस्थित होत्या. भिंत कोसळल्यामुळे चौदा वर्षीय विद्यार्थिनी ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
यात शाळेचे मुख्याध्यापक व महिला अधीक्षक एस.पी.रावत यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणी नातेवाईकांनी आक्रमक होत जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत चिखलदरा तालुक्याचे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणि आदिवासी निरीक्षक यांचा समावेश आहे. समिती लवकरच घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शाळेच्या इमारतीची दुरवस्था, देखभाल दुरुस्तीचा अभाव, आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेला, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.