सरकारी नोकर भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार, शासन निर्णय पारित
राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केल्यानंतर आता याबाबत चा अधिकृत शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
दिनांक २ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्यानंतर आता सर्व पदांसाठी MPSC द्वारे पदभरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे सरळसेवेने टप्प्याटप्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरीता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा.करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने, जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावयाची आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल. तद्नंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावयाची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करणार आहे.


