शेतकऱ्यांना करता येणार,अनधिकृत बियाणे विक्रीची तक्रार…
जळगांव: आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून जळगांव जिल्हयात १६ भरारी पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व किटकनाशक विक्री करणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.
कृषी विभागाकडून खरीप हंगामचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय १ व तालुकास्तरीय १५ असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या मुळे शेतकरी बांधवांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व कापूस बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते.
पावती, टॅग, लॉट क्रमांक तपासा:बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकिटाचा टॅग व लॉट क्रमांक शेतकऱ्यांनी पडताळून घेतल्यानंतर खरेदी करावी. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पिक निघेपर्यंत जपून ठेवावे. अनिधकृत / विनाबिलाने बियाने खरेदी करू नये. किटकनाशक, तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत खरेदी करताना रितसर बिल घ्यावे, असेही कृषी विभागाकडून कळवण्यात आले आहे.
कृषी अधिकाऱ्यांकडे करता येईल तक्रारजर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीयासारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार कृषी अधिकारी किंवा पंचायत कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास करता येणार आहे. एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरित्या व विना बिलाने खरेदी करू नये, अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास ०२५७-२२३९०५४ या दुरध्वनी क्रमांकावर तर ९८३४६८४६२० या क्रमांकावर तक्रार करता येईल
