राज्य सरकार शाळेत चला अभियान राबविणार – मंत्री दिपक केसरकर
राज्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
17 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात 1 हजार ६२४ मुले व 1 हजार 590 मुली असे एकूण 3 हजार 214 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण 365 बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व 365 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत 763 बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


