पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी त्याच वर्गात, मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित…
राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
पाचवीला प्रत्येक विषयासाठी ५० गुण, आठवीला प्रत्येक विषयाची ६० गुणांची परीक्षा शाळा स्तरावर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार असून, पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांला त्याच वर्गात ठेवले जाईल. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय पारित केला आहे.
केंद्र सरकारने कलम १६ मध्ये सुधारणा करून पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार राज्यातही पाचवी, आठवीसाठी परीक्षा लागू करण्यात आली आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांत पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांला पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. मात्र, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळेतून काढले जाणार नाही.
पाचवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग एक आणि भाग दोन, तर आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे हे वार्षिक परीक्षेसाठी असणार आहेत. पाचवीच्या प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी ४० गुण असे एकूण ५० गुण, तर आठवी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी ५० गुण असे एकूण ६० गुण, असा गुणभार निश्चित करण्यात आला आहे.
पाचवीसाठी प्रती विषय किमान १८ गुण (३५%), आठवीसाठी प्रती विषय किमान २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक,गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण राहणार आहेत, विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे कमाल १० गुण देता येणारं आहे.तरी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षेस गैरहजर राहिल्यास पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे.
पुनर्परीक्षेची संधी विदर्भात जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात, तर उर्वरित राज्यात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


