तलाठी परीक्षेत 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण…
5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तलाठी भरतीत टॉपर विद्यार्थिनीला 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत.याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा गॅप असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
या सगळ्या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


