केवायसी पूर्ण नसलेले फास्टॅग जानेवारी अखेर रद्द होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बँकांना निर्देश…
ग्राहकांची ओळख पटवून देणारी प्रक्रिया अर्थात ‘केवायसी’ पूर्ण केलेली नाही अशी ‘फास्टॅग’ खाती ३१ जानेवारीपासून बंद करण्यात यावीत, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी अशी सुविधा देणाऱ्या बँकांना दिले.
प्राधिकरणाने म्हटले आहे की, पथकर नाक्यांवरील पथकर संकलनाची व्यवस्था कार्यक्षम आणि जलद करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी केला जातो. एका फास्टॅगचा वापर केवळ एकाच वाहनांसाठी व्हावा, या दृष्टीने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण राबविले जात आहे. याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांनी फास्टॅग संबंधाने ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी ‘केवायसी’ पूर्ण करावी अन्यथा त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सध्या फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांची संख्या ८ कोटींवर पोहोचली आहे, असेही प्राधिकरणाने नमूद केले. तथापि एकाच वाहनांसाठी अनेक फास्टॅग काढण्यात आल्याची प्रकरणेही पुढे आली आहेत. याचबरोबर बँकेची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण न करता फास्टॅग काढण्यात आली आहेत. हा रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक निर्देशांचा भंग असल्याने प्राधिकरणाने एका वाहनासाठी एकच फास्टॅग या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणामुळे पथकर संकलन जलद होणार आहे.
एक फास्टॅग, एक वाहन या धोरणाचे पालन ग्राहकांनी करणे गरजेचे आहे. त्यांनी आधी अनेक फास्टॅग काढली असतील तर ती रद्द करावीत. केवळ त्यांचे सर्वात ताजे फास्टॅग खाते सुरू राहणार असून, ३१ जानेवारीपासून जुनी फास्टॅग खाती रद्दबातल होतील. ग्राहकांनी काही शंका असल्यास नजीकचे पथकर नाके अथवा फास्टॅग देणाऱ्या बँकांशी संपर्क साधावा, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.
